नवी दिल्ली – एनडीए सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबु नायडू यांचे १६ जागांमुळे चांगलेच वजन वाढले आहे. लोकसभा सभापती पद आपल्या पक्षाला मिळावे यासाठी ते आग्रही असल्याची काही दिवसांपासून चर्चा असतानाच आता डि. पुरंदेश्वरी यांचे नाव समोर आल्यामुळे नायडू यांचे गणित बदलणार असल्याचे मानले जाते. एकप्रकारे नायडू यांची मागणीच निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
डी. पुरंदेश्वरी या तेलगु देसम पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशातील दिग्गज नेते दिवंगत एन. टी. रामा राव यांच्या कन्या आहेत. म्हणजे त्या तेलगु देसम पक्षाचे विद्यमान प्रमुख चंद्राबाबु नायडू यांच्या मेव्हणी आहेत. १९९६ मध्ये नायडू यांनी जेंव्हा पक्षात बंडखोरी केली होती त्यावेळी पुरंदेश्वरी यांनी नायडू यांना समर्थन दिले होते. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेची त्यावेळी भरपूर चर्चा झाली होती.पुरंदेश्वरी यांचे शिक्षण चेन्नईत झाले असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चित्रपट निर्माता डग्गुबाती रामानायडू यांचा पराभव केला होता. बापटला मतदार संघातून विजयी होत त्या पहिल्यांदाच संसदेत दाखल झाल्या होत्या. आताच्या लोकसभा निवडणुकीत त्या राजमहेंद्रवरम मतदार संघातून २ लाख ४० हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. वायएसआर कॉंग्रेसचे जी श्रीनिवासन यांचा त्यांनी पराभव केला आहे.
पक्षात आपल्याला बाजुला केले जात असल्याची भावना झाल्यानंतर पुरंदेश्वरी यांनी २००४ मध्येच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००९ मध्ये त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्याच सरकारमध्ये त्यांना नंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्रीही करण्यात आले होते.
तथापि, २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता त्या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षा आहेत. भाजपने त्यांना ओडिशा, छत्तीसगढ आदी राज्यांचे प्रभारी पदही सोपवले आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांना आंध्र प्रदेशच्या सुषमा स्वराजही म्हटले जाते.
पुरंदेश्वरी या नायडू यांच्याच समाजाच्या आणि त्यांच्या नातलगही असल्यामुळे त्यांना सभापती केले तर नायडू यांच्यावर सौम्य दबाव राहणार आहे. ते जाहीरपणे पुरंदेश्वरी यांच्या नावाला विरोध करू शकणार नाहीत. त्यांचा कम्मा समुदाय आंध्र प्रदेशच्या राजकारणात अत्यंत प्रभावशाली मानला जातो.