महर्षीनगर – म्हाडा वसाहत मध्ये विजेच्या खांबाला झाडाने वेढले असून धोकादायक झाडाच्या फांद्या छाटण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांकडून सदर झाड सार्वजनिक जागेत नसल्याचे कारण देऊन या कामास टाळाटाळ केली जात आहे. झाडाच्या फांद्या काढव्यात, या मागणीसाठी आता काय न्यायालयात जायचे का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
या परिसरात अनेक झाडे ही वैयक्तिक मालकीच्या जागेत असून फांद्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धोकादायकरित्या आल्या आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही फांद्या छाटल्या जात नसताना दुसरीकडे उद्यान अधिकारी हद्दीचे कारण देऊन मुख्य रस्त्यावरील धोकादायक वाढलेल्या फांद्या कमी करण्याची जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उद्यान विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
“महर्षी नगर म्हाडा वसाहती मधील धोकादायक फांद्या आम्ही काढणार होतो. मात्र पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढल्या त्यामुळे विभागाकडील काम वाढले. आता विजेच्या खांबा लगत असलेल्या झाडांच्या फांद्या विद्युत विभागानेच काढाव्यात, त्यांना तसे अधिकार आहेत.” – भारत गायकवाड, उद्यान अधिकारी, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
“क्षेत्रीय कार्यालय अधिकारी धादांत खोटी कारणे सांगून काम करण्यास गेली तीन महिन्यापासून टाळाटाळ करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना फक्त मलईयुक्त कामे करण्यात इंटरेस्ट आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारीवर कोणतेही काम होत नाही, प्रशासकांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.” – राजेश बेल्हेकर, स्थानिक नागरिक