पुणे – शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली पीएमपी सक्षम करण्यासाठी राज्य शासनच उदासीन असल्याचे पुन्हा समोर आले आहे. पीएमपीचे विद्यमान संचालक संजय कोलते यांची शासनाने बदली केली असून, पीएमपीची जबाबदारी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
येरेकर हे पीएमपीचे वर्षभरातील तिसरे संचालक असतील. तर गेल्या १७ वर्षातील २२ वे संचालक आहेत. त्यामुळे आतापर्यंत कार्यकाळ पूर्ण करणारा एकही संचालक नसल्याने पीएमपी सक्षम होणार तरी कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणारी पीएमपी ही एकमेव यंत्रणा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढावा, यासाठी ती सक्षम करणे आवश्यक आहे.
मात्र, त्यासाठी शासनाकडून पूर्ण वेळ अधिकारीच दिला जात नाही. गेल्या १७ वर्षात पीएमपीवर २१ संचालक नियुक्त करण्यात आले असून त्यातील एकाही संचालकाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. तर, गेल्या पाच ते सहा वर्षांत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालकपद केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुण्यात तात्पुरत्या बदलीचे ठिकाण म्हणून दिले जात आहे. त्यामुळे पीएमपीची सेवा दिवसेंदिवस ढासळत असल्याने शहरात खासगी वाहनांची संख्या लक्षणीय वाढत असून प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे.