पुणे – राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत तब्बल दहा टक्के दरवाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी (दि.1 जुलै) पासून सुरू करण्यात आली. त्यानुसार घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ०.६ ते ०.१२ पैसे, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांना १.२१ रुपये ते २.४२ रुपये आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना १८.१५ ते ३६.३ रुपये वाढ करण्यात आली आहे. या दरानुसार स्थानिक स्वराज्य संस्था जलसंपदा विभागाला पैसे द्यावे लागणार आहेत.
हा निर्णय सन २०२२ मध्येच वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दरात सन २०२४-२५ या जलवर्षांसाठी दहा टक्के वाढ करण्यात येणार होती. त्यानुसार १ जुलै २०२४ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून राज्यातील सर्व धरणांमधून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दर ठरवण्यात येतात. त्यानुसार जलसंपत्ती प्राधिकरणाकडून फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीवापराचे दर प्रस्तावित करण्यात आले होते.
या दरांबाबत हरकती, सूचना मागवण्यात येऊन नवे दर एप्रिलमध्ये निश्चित करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हे दर ठरविताना सन २०२३-२४ आणि सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांत प्रत्येकी दहा टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. मंजूर कोट्यापेक्षा १०० ते १२५ टक्के जादा पाणीवापर केल्यास महापालिकांना अनुज्ञेय दराच्या दीडपट, १२५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीवापर केल्यास तिप्पट दर आकारण्यात येणार आहे.