पुणे – मंडल कमिशनच्या माध्यमातून संघर्ष करून ओबीसी आरक्षण मिळाले आहे. निवडणुका येतील आणि जातील. निवडणुकीतील फायद्यासाठी ओबीसींचा प्राण घेऊ नका, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नातून शासनाला मार्ग काढू देण्यासाठी आंदोलन स्थगित केले आहे. अन्याय होत असल्याचे निदर्शनास येताच पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ओबीसी उपोषणकर्ते अॅड. मंगेश ससाणे यांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी खासदार समीर भुजबळ यांचा समावेश होता. शासनाच्या वतीने अॅड. ससाणे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. राज्य शासनाचे पत्र ससाणे यांना भुजबळ यांना दिले आणि ससाणे यांनी उपोषण मागे घेतले.
भुजबळ म्हणाले, ही लढाई संपलेली नाही. ही सोपी लढाई नसून खूप काळ लढावी लागणार आहे. पण हे आंदोलन थांबविलेले नाही, थांबविणार नाही. केवळ स्थगित करत आहोत. आपल्याविरोधात पुन्हा गोष्टी घडत असल्याचे दिसून आल्यास पुन्हा आंदोलन सुरू करू. कुणबी प्रमाणपत्राने आम्हाला धक्के मारून बाहेर काढण्यात येत आहे. सर्व बाजूंनी आमची नाकाबंदी सुरू आहे. आम्ही कुणाचे मागतो का?, त्यांना स्वतंत्र द्या. आमचे जेवढे आहे, तेवढे कायम ठेवा, एवढीच आमची मागणी आहे.
आमचे आरक्षण पूर्ण भरलेले नाही, तोवरच मागच्या दाराने ओबीसींमध्ये प्रवेश होत आहे, हे थांबले पाहिजे. गिरीश महाजन म्हणाले, समाजात तेढ निर्माण होत आहे, हे राज्यासाठी चांगले नाही. ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजावर अन्याय न करता तोडगा काढण्याची सरकारची भूमिका आहे.