पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाची नुकतीच जामिनावर मुक्तता केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे.
कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर १५ दिवस काम करणे, तसेच दारू सोडविण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला.
या आदेशावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बाल न्याय मंडळात निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली. मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, मुलाची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर निकाल दिला.
न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले, तसेच मुलाचा ताबा आत्याकडे देण्याचेही आदेश दिले. २५ जून रोजी रात्री मुलाची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. त्याच्या आत्याकडे मुलाला सोपविण्यात आले होते.
यावर पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागितली होती. विधी आणि न्याय विभागाने पोलिसांना शनिवारी परवानगी दिली. दोन ते तीन दिवसांत पुणे पोलिसांकडून याची प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.