– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूल व जुनियर कॉलेज येथील शालेय पोषण आहार योजनेमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी झालेला अहवाल व कार्यवाहीची अंमल बजावणी करावी व संबंधीतांवर कडक कारवाई करा.
तसेच चौकशी होईपर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी लेखी निवेदनाद्वारे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे शुक्रवार (ता.28 जून) रोजी केलेली आहे.
यासंदर्भात दिलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक नारायनदास रामदास हायस्कूल व ज्यु.कॉलेज,इंदापूर यांना शापोआ योजना वसुली बाबतचे पत्र (ता. ३१.मे) रोजी पाठवले आहे. तरी देखील ठोस कारवाई होत नाही.
यामध्ये श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथील कथीत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार यामध्ये संबंधीत मुख्याध्यापक आणि इतर यांनी अपहार केला आहे. असे चौकशी अहवालावरून सिध्द झाले असून त्यांना रक्कम शासन खाती जमा करण्याचे आदेश दिलेले असताना त्यावर अद्याप काही कारवाही झालेली दिसत नाही.
१९३८ सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत हजारो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पवित्र कार्य करीत असतानाच, हल्ली अशा घटना घडणे ही शोकांतीका आहे.
शालेय पोषण आहार योजनेमध्ये अपहार होणे हेच मुळात तालुक्यातील या संस्थेमध्ये शिकणाऱ्या गोर गरीब विद्यर्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. शासन विविध योजनांद्वारे शिक्षण तळागाळात पोहचवण्याचे काम करत असतानाच सोरटे यासारखे मुख्याध्यापक आणि त्यांचे भ्रष्ट सहकरी त्यामध्ये पदाचा गैरवापर करत अडथळा आणताना दिसत आहेत.
मुख्याध्यापक ह्यांच्या बद्दल बऱ्याच पालकांची तक्रार असल्याचे समजते नुकत्याच चालू असलेल्या शालेय ऍडमिशन संदर्भात अत्यंत मुजोरीने बोलणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश संदर्भात आगाऊची प्रवेश शुल्काची मागणी करणे बंगल्यावर जाऊन भेटा म्हणजे त्यांनी सांगितल्यास प्रवेश होईल या सारख्या बऱ्याच तक्रारी पालक बोलून दाखवत आहेत.
ही संस्था प्रायव्हेट लि.असल्यासारखा कारभार सद्या चालू आहे. इतके सर्व होत असताना संस्थेमध्ये हा जो अनागोंदी कारभार हे मुख्याध्यापक करत असताना, संस्थाचालक म्हणून अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ हे जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करत आहेत. म्हणून हे प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर कडक कार्यवाही व्हावी.आणि जो काही अपहार झाला आहे.याची पाळेमुळे शोधावी व कठोर कार्यवाही करावी.अशीही माहिती पत्रकारांना बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,व इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली.
“खासदार सुप्रिया सुळे यांना पाठवले निवेदन “
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आप्पासाहेब जगदाळे व भरत शहा यांनी संबंधित प्रश्नावर,ठोस कार्यवाही होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार पाठवलेली आहे.त्यामुळे संसदेत हा प्रश्न गाजणार हे मात्र नक्की.