पुणे – “चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची ही परंपरा अशीच राहील. जोपर्यंत वारीची परंपरा आहे, तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील,’ अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केल्या.
फडणवीस यांनी सोमवारी पालखी विठोबा मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि निवडुंगा विठोबा मंदिरात जाऊन संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
“राज्याच्या काही भागात म्हणजे विदर्भ, मराठवाडा या भागात पाऊस पाणी व्यवस्थित झाल्याने पेरण्याही समाधानकारक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बळीराजा हा वारीत सहभागी होऊन पंढरीला निघाला आहे. त्यामुळे यंदा वारीमधील वारकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पर्यायाने पंढरपुरातही ही गर्दी लक्षणीय वाढलेली असेल,’ असे फडणवीस म्हणाले.
तर “बंदोबस्त संबंधित सर्व उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: बैठक घेतली आहे. आम्हीही त्या बैठकीला उपस्थित होतो. माऊलीला कोणतेच साकडे घालावे लागत नाही. त्यांना आपल्या मनातील सगळे माहिती असते. त्यांचा आशीर्वाद घेतला की सगळे मनाप्रमाणे होते,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.