पाणीटंचाईच्या काळातही रस्त्यांवर धुळ उडू नये म्हणून मारताहेत सडे
जुन्नर – सध्या सर्वत्र कडक उन्हाळ्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना जुन्नरमध्ये मात्र रस्त्यावरील धूळ घरात, दुकानात उडून येते. म्हणून सकाळ संध्याकाळ डांबरी रस्त्यावर पाण्याचे सडे मारून नगरपरिषदेकडून होणार्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची नासाडी यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. असे पाणी वाया घालविण्यार्या विरुद्ध जुन्नर नगरपरिषदेने ठोस कार्यवाही करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
सध्या सगळीकडे कडक उन्हाळ्यामुळे सर्वच जण हैराण झालेले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून सध्याची पाणी पातळी चिंताजनक आहे. जुन्नर नगरपरिषदेला माणिकडोह धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. हे पाणी शुद्ध करून नगरपरिषदेकडून ते दररोज देण्यात येते.
सध्या बहुतांश रस्त्यावर धूळ व मातीचे प्रमाण अधिक असल्याने वार्याबरोबर ही माती घरामध्ये दुकानांमध्ये येते. ते रोखाण्याकरिता अनेक घरे दुकानाबाहेर सकाळ संध्याकाळ शुद्ध पाण्याचे सडे मारले जातात. उष्णतेमुळे रस्त्यावरील पाणी लगेच सुकून जाते. व पुन्हा धूळ उडण्यास सुरुवात होते. परंतु यामध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. याकरिता नगरपरिषदेने दंडाची कारवाई सक्तीने करण्याची गरज आहे.
नगरपरिषदेने कार्यवाही करावई
जुन्नर परिसरातील गाड्या धुण्याची सर्व्हिस स्टेशन कार्यरत असून याठिकाणी दिवसभर लहान मोठ्या चारचाकी, दुचाकी धुतल्या जातात. याही ठिकाणी पाण्याची नासाडी होते. तर अनेक निवासी इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या भरून बराच वेळ वाहत असतात. याकडे कोणाचेही लक्ष नसते. तेथेही पाण्याची नासाडी होत राहते. नगरपरिषदेने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.