संजय सोनवणी : चौफुल्यात तिसरे भीमथडी साहित्य संमेलन
यवत – “बहुजन समाजाने रामायण, महाभारत काळाच्या अगोदरपासून मानवतावादी मूल्ये जपली, पुरुषोत्तम राम लोकांनी मनोभावे स्वीकारला. नमस्कार घालताना राम राम म्हणायचे, ही बहुजनांची संस्कृती आहे, यातून माणुसकी, समता, बंधुभाव जोपासना केली जाते. राम राम घालून माणुसकी जिवंत ठेवणारी राम ही बहुजनांची संस्कृती आहे. श्रीराम नाही, असे परखड मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला (ता. दौंड) येथे तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्ष दिग्विजय जेधे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यभरातून आलेले साहित्यिक, लेखक, कवि, कलावंत यांनी (स्व) डी. के. खळदकर साहित्यनगरीत साहित्य सादर केले. रसिकांनी याचा मनमुरादपणे आनंद लुटला.
यावेळी संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, जलदगती न्यायालय मुंबईचे न्यायाधीश वसंत पाटील, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, जयप्रकाश वाघमारे, रेखा काळे, अभिनेत्री गौरी, रत्नपारखी, सुषमा काळे, अभिनेता सागर शेलार, तानाजी केकाण, नितिन भागवत, भाऊसाहेब फडके, विश्वास माने, मोहन जाधव, सागर फडके, वसंत साळुंखे, संजय मेढे, तेजस टेंगले, दत्तात्रय डाडर, बाळासाहेब काळे, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक पवार, राजाभाऊ जगताप, बाळासाहेब मुळीक, विनायक कांबळे, जगदीप वनशिव, रवींद्र खोरकर, रामभाऊ नातू उपस्थित होते.
संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिग्विजय जेधे यांनी मार्गदर्शन केले. दशरथ यादव यांनी प्रास्ताविक केले. संजय मेढे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. दीपक पवार यांनी आभार मानले.
आर्यांचे बदल बहुजनांनी स्वीकारले नाहीत
संजय सोनवणी म्हणाले, उत्तर भारतात आक्रमण केलेल्या आर्यांनी स्वतः चा प्रभाव निर्माण करण्यासाठी मूळ निवासी भारतीय संस्कृती मोडीत काढताना त्यात बदल केले. पण बहुजनांनी त्याचा कधी स्वीकार केला नाही. शेवटी त्यांना बहुजन, देवता व महापुरुषांचा आधार घ्यावा लागला. मानवी मुल्य जोपासने ही रामाची संस्कृती आहे तर धर्म आणि जातीमध्ये दुरावा करणे ही श्रीरामाची संस्कृती आहे. प्राचीन काळापासून समाजात महिला ही प्रमुख होती. मातृसत्ताक संस्कृती मोडीत काढून पुरुष सत्ताक संस्कृती वैदिकांनी बिंबविण्याचे काम केले.