मंचर – आंबेगाव तालुक्यातील माळीमळा (कळंब) येथे विधवा प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मूठमाती देण्याचा गावकऱ्यांनी निर्धार व्यक्त केला. गावातील विधवा महिलांचा पुढील काळात सन्मान व्हावा व त्यांना समाजाकडून मिळणारी दुय्यम स्वरूपाची वागणूक बंद व्हावी या दृष्टीने विधवा सन्मान कायदा अंमलबजावणीसाठी ठराव करण्यात आल्याचे सागण्यात आले.
यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या पुढाकारातून माळीमळा (कळंब) येथे वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने विधवांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. याबद्दल कळंब ग्रामपंचायच्या लोकनियुक्त सरपंच उषा कानडे यांनी सर्व महिलांचे कौतुक करून त्यांना महिलांना सर्व कार्यक्रमात मानाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने माळीमळा येथे गावातील सर्व महिलांनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे. म्हणून दीर्घायुषी असणाऱ्या वडाच्या झाडाला सुती दोऱ्याने 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालत हाच पती 7 जन्म लाभवा.
अशी मनोभावे प्रार्थना केली. विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला हळदी कुंकु अक्षता व गोड नैवद्य दाखवला. दिवसभर उपवास केला.एकमेकींना हळदी कुंकू देऊन समोरील सुवासिनीच्या आदिशक्तीला शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, विधवा महिलांना हे सर्व करण्यास समाजाने घालून दिलेली बंधने अडसर ठरत आहेत. त्यांच्या वाट्याला विधवा म्हणून जगणे नशिबी आले. त्यात त्यांची काय चूक ? म्हणून समाजाने त्यांना वेगळे न समजता इतर महिलांप्रमाणे सन्मान द्यायला हवा यासाठी त्यांच्या हातून हळदी- कुंकू व सुवासिनी महिला साजरा करत असलेला वड पूजन कार्यक्रम गावातील सर्व विधवा महिलांच्या हस्ते यशवर्धिनी संस्थेच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व महिलांना त्यांनी केलेल्या विधवा महिला सन्मान व संरक्षण संदर्भातील संकल्पाची आठवण म्हणून संघाच्या वतीने १ गुलाबाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमासाठी यशवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष योगिता बोऱ्हाडे, सचिव अलका घोडेकर, ललिता वर्पे, शांताबाई थोरात, सविता चिखले, नयना भालेराव, रोहिणी कानडे, सविता थोरात, सविता शिंदे, अश्विनी वाव्हळ, गुलाब कानडे, लेखापाल कल्पना एरंडे, कार्यकर्ते सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे इत्यादी बचत गटातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना सपना कानसकर,सूत्रसंचालन रुपाली कानडे यांनी तर आभार कल्पना कानडे यांनी मानले.
पतीच्या निधनानंतर आई – वडील अशा दुहेरी भूमिकेतून कुटुंब व मुलांना त्याच्या अपेक्षित स्वप्नापर्यंत पोहचविण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेत. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा ती मायमाऊली प्रयत्न करते.त्यांच्याच लग्नकार्यात तिला त्यांना औक्षण करण्याचा मान देखील दिला जात नाही. अश्या जुन्या प्रथा बंद करण्यासाठी सर्वांनी एकविचाराने पुढे आले पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून विधवा सन्मान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक नागरिकाने अशा महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
– कुमार घोलप, मुख्य कार्यकारी अधिकारी, यशवर्धिनी संघ