जिल्हाधिकारी दिवसे : 233 अतिसंवेदनशील गावे
नारायणगाव : जुन्नर वनविभागातील बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी मनुष्य व मृत्यूच्या घडलेल्या घटना विचारात घेऊन जुन्नरसह आंबेगाव शिरूर खेड तालुक्यातील 233 अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष सुहास दिवसे यांनी घोषित केले आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश असून वन विभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्यादृष्टीने जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण व शिरुर या सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागलेले आहे. जुन्नर वन विभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. यात प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिपळगांव जोगे, वडज , चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झालेली आहे.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब अशी दिर्घकालीन बागायती पिके या भागात मोठ्या प्रमाणात होतात. दिर्घकालीन पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असते. तसेच शेती व्यवसायामुळे मानवाची पाळीव प्राण्यांसह शेतातील रहिवासांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत असल्याने बिबट या वन्यप्राण्यांचा अधिवास बागायती क्षेत्रातच निर्माण झालेला आहे. बिबट्याचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत असल्याने गेली 23 वर्षांपासून वनविभागात मानव बिबट संघर्षामध्ये वाढ होत आहे.
400 ते 500 बिबटे असण्याची शक्यता
भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडून संस्थेमार्फत जुन्नर वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती बिबट वन्यप्राण्याच्या संख्येची घनता प्रति 100 चौ.कि.मी. मध्ये 6 ते 7 बिबटे इतकी आढळून आली आहे. तसेच बिबट्यांचे मानवावरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची एकूण संख्या अंदाजे 400 ते 450 असण्याची शक्यता आहे.
5 वर्षांत 16 मृत्यू, 40 गंभीर जखमी
जुन्नर वनविभागात मागील 5 वर्षांत बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 40 गंभीर जखमी व 16 मृत्युच्या घटना घडलेल्या आहेत.या क्षेत्रात बिबट्याचा मानवावरील हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली असून हे क्षेत्र हे मानव-बिबट संघर्षाचे आपत्तीक्षेत्र झालेले आहे. बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत्युच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता हे क्षेत्र संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.