पुणे – पुणे, पिंपरी- चिचवड महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते. यातील २५ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. १३ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश जाहीर होऊनही प्रत्यक्षात मुदतीत प्रवेश घेतलेच नाहीत.
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीत ९५ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यातील ८५ हजार २७३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन ते लॉक केले होते. ७० हजार २८७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग- २ भरून कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. ३४३ महाविद्यालयांत १ लाख २० हजार १३० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. कॅप अंतर्गत ९३ हजार ५९९ व कोटाअंतर्गत २६ हजार ५३१ प्रवेशाच्या जागांचा समावेश आहे.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत कॅप अंतर्गत २० हजार ५३६ व कोटाअंतर्गत ४ हजार ८०५ विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे. ८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले असून ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत.
पहिल्या पंसतीक्रमाच्या महाविद्यालयांचे प्रवेश २१ हजार ८३९ विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आले होते. त्यातील १५ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ५ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या नियमित प्रवेश फेरीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर दुसरी नियमित प्रवेश फेरी ३ जुलैपासून सुरु होणार आहे.