नवी दिल्ली : लोकसभा सभापती पदाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष झाल्यानंतर आता उपसभापती पदासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने वेगळी रणनीती आखली आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून अर्थात एनडीएकडून या विषयावर तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चा केल्यावर ममता यांनी फैजाबाद येथून निवडून आलेले खासदार अवधेश प्रसाद सिंह यांचे नाव पुढे केल्याचे समजते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ममतांनी असे करून एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.
कॉंग्रेसला या पदावर आपला उमेदवार आणायचा आहे. लोकसभेत कॉंग्रेसच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तरीही ममता बॅनर्जी यांची अशी इच्छा आहे की उपसभापती पदावरही कॉंग्रेसचा उमेदवार नको. जरी कॉंग्रेस ममता यांच्या प्रस्तावावर काही बोलत नसली तरी या प्रस्तावावर कॉंग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची सहमती होण्याची दाट शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे कॉंग्रेस सध्या तरी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करण्याचा विचार करते आहे.
अवधेश प्रसाद यांना उपसभापती केले तर केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशातील अन्य राज्यांतील दलित मतदारांनही आपल्याकडे वळवण्यास मदत होईल असा विरोधकांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष एका विशिष्ट जातीचा पक्ष असल्याचे मानले जाते. मात्र आताच्या लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद हे या पक्षाचा दलित चेहरा म्हणून उदयाला आले आहेत. हा चेहरा दलित म्हणून इंडियाच्या अन्य पक्षांनाही फायद्याचा ठरणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर काही महिन्यातच अयोध्येत भाजपचा पराभव होणे हा फार मोठा संकेत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेस, समाजवादी पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा अवधेश यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून दलित मतपेढीच्या संदर्भात भाजप फारच सतर्क झाली आहे. त्यामुळे उपसभापती पदासाठी विरोधकांनी दलित चेहरा दिला तर भाजपसाठी ते टाळणे अडचणीचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशात दलितांच्या एका मोठ्या वर्गाची मते समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसकडे वळल्यामुळेच भाजपला धक्का बसल्याचे समोर येत आहे. भाजप संविधान बदलणार आहे आणि आरक्षण समाप्त करणार असल्याचे नॅरेटीव्ह सेट केले गेले तेच या पराभवामागचे कारण आहे. त्यामुळे अवधेश यांना विरोध करणे भाजपला तापदायक ठरणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यावर आता काय तोडगा काढता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.