नवी मुंबई – राज्यभरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून या पोलीस भरतीला गालबोट लावणारी घटना आज घडली आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षांचा तरुण सहभागी झाला होता. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा राहणारा होता. एसआरपी भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय मैदानातच कोसळला.
त्यानंतर त्याला अत्यावस्थ अवस्थेमध्ये तातडीने कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.
अक्षय 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप नातेवाईंकांनी केला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्यांनी काही सेवन केले होते.
याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.