मुंबई : खाकी वर्दी घालून देशसेवा करण्याचं स्वप्न अनेक तरुणांचं असतं. त्यासाठी ते रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करुन जीवतोड मेहनत घेताना दिसतात. पोलीस भरती करणारे तरुण तर तुम्हाला घरी कमी आणि मैदानावर जास्त पाहायला मिळतील. मात्र सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीसाठी धावताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर आणखी 6 उमेदवारांचीही प्रकृती खालवली. या सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अक्षय बिहाडे असे मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा अमळनेरचा रहिवासी आहे. अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिहाडे हा तरुण 27 जूनला पोलीस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता. 29 जूनला मैदानी चाचणीसाठी धावत असताना 3-4 किमीनंतर त्याला भोवळ आल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
6 उमेदवारांचीही प्रकृती खालवली
या मैदानी चाचणीदरम्यान धुळे येथील प्रेम ठाकरे (वय 29) याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. पवन शिवाजी शिंदे (वय 25), अभिषेक शेटे (वय 24), सुमित किशोर आडतकर (वय 23), साहिल किशोर लवण (वय 19) यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर अमित गायकवाड याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.