नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच भाषणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी राहुल गांधींचा उल्लेख बालकबुद्धी असा केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात…
राहुल गांधींना बालक बुद्धी म्हणत लगावला टोला
‘काल देशाने संसदेत बालिशपणा बघितला. देशाला माहिती आहे की हे लोक कोट्यवधींचा घोटाळा करून जामिनावर बाहेर आहेत. ओबीसींना शिव्या दिल्यामुळे यांना शिक्षा झाली आहे. यांच्यावर महान स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांचा अपमान करण्याचा खटला सुरू आहे. यांच्यावर देशाची सगळ्यात मोठी पक्षाला हत्यारा म्हणण्याचा खटला सुरू आहे. यांच्यावर अधिकारी आणि संस्थांबाबत खोटं बोलण्याचा आरोप आहे. बालक बुद्धीमध्ये ना बोलायचा ठावठिकाणा आहे ना बालक बुद्धीमध्ये वागायचा ठावठिकाणा आहे. ही बालक बुद्धी संसदेतही गळ्यात पडते, संसदेत डोळे मारते’, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना लगावला.
नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका
‘लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100 चा आकडा पार करू शकली नाही. मला एक किस्सा आठवतो. एक बालक 99 मार्क घेऊन फिरत होता. सगळ्यांना मला किती जास्त मार्क मिळाले हे सांगत होता. लोकही 99 मार्क पाहून त्याला शाबासकी देत होते. काहींनी विचारलं कोणत्या गोष्टीची शाबासकी देत आहात? याला 100 पैकी 99 नाही तर 500 पैकी 99 मार्क आले आहेत. यांना पाहून शोले चित्रपटाची मौसी आठवत आहे’, अशी टीकादेखील नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केली.
मोदींनी राहुल गांधींवर केले आरोप
‘देशाने काल 1 जुलैला खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलैला लोक त्यांची बँक अकाऊंट चेक करत होती. 8,500 रुपये आले का नाहीत? खोट्या नरेटिव्हचा परिणाम बघा. काँग्रेसने देशाची दिशाभूल केली. माता-भगिनींना महिन्याला 8,500 रुपये द्यायचं खोटं. माता-भगिनींच्या मनाला जी जखम झाली आहे ती काँग्रेसला नष्ट करणार आहे. ईव्हीएमबाबत खोटं, संविधानाबाबत खोटं, राफेलबद्दल खोटं, बँकांबाबत खोटं. यांचं प्रोत्साहन एवढं वाढलं की काल संसदेतही यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अग्निवीरबाबतही खोटं बोलले,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या भाषणातून राहुल गांधींवर केला.