नवी दिल्ली – दोन हजार रूपयाच्या नोटा बाजारातून काढून घेण्यास आता वर्षभरापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. मात्र बाजरात जेवढ्या नोटा त्या अगोदर होत्या त्या अद्यापही पूर्णपणे रिझर्व्ह बँकेकडे पोहोचलेल्या नाहीत. नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार अजुनही ७५०० कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेल्या दोन हजाराच्या नोटा लोकांकडेच पडून आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे आरबीआयच्या एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीनुसार ९७.८७ टक्के नोटा बँकेकडे परत आल्या आहेत. मात्र ज्या नोटा अजुनही लोकांकडे आहे त्यांचे मूल्य ७५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.
आरबीआयने गेल्या वर्षी १९ मे रोजी २ हजारच्या नोटा परत घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ३.५६ लाख कोटी रूपयांच्या नोटा बाजरात होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये जी नोटबंदी करण्यात आली होती, त्यानंतर या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या.
नोटबंदीच्या निर्णयाद्वारे १ हजार रूपयाच्या आणि ५०० रूपयाच्या जुन्या नोटा बाद ठरवण्यात आल्या होत्या. त्यावेळी एकच वेळी मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली होती.
त्यामुळेच आरबीआयने २ हजारच्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बाजारात पर्याप्त चलन उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.