वडूज, (प्रतिनिधी)- येथे सुरू झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून लोकांना चांगले उपचार व चांगल्या आरोग्यदायी सोयी सुविधा मिळाव्यात. आपला दवाखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले.
त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार गोरे बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बजरंग खाडे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नगराध्यक्षा मनीषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, विविध विकासकामांच्या माध्यमातून खटाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलत आहे. वडूज येथे सुरू झालेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या माध्यमातून रूग्णांना चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात.
केंद्र व राज्य सरकार विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत बहुतांशी आजार समाविष्ट करून राज्य सरकारने जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.
केंद्र शासनाने आयुष्यमान भारत योजनेतून नागरिकांना पाच लाख रूपयांपर्यंत मोफत उपचाराची सोय केली आहे. या दवाखान्यात सर्प दंश लस कायम उपलब्ध असावी, रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे काम येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम करावे.
डॉ.येळगावकर म्हणाले, आमदार गोरे यांच्यामुळे वडूज याठिकाणी राज्य शासनाचा आपला दवाखाना सुरू होत आहे. आमदार गोरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम खटाव, माण तालुक्यांत प्रभावीपणे राबविल्या आहेत.
येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी सौहार्दपूर्ण वागणारे चांगले अधिकारी नेमावेत. जिल्हा आरोग्य विभागाने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था थांबवावी.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत संबंधित अधिकारी किती वेळ हजर असतात त्यांची तपासणी करावी. नगराध्यक्षा सौ. काळे म्हणाल्या, वडूजचे ग्रामीण रुग्णालय येण्या-जाण्यासाठी गैरसोयीचे असल्याने वडूजमध्ये मध्यवर्ती सुरू झालेला आपला दवाखाना रुग्णांना अतिशय सोयीचा ठरणारा आहे. नगरसेविका सौ. रेश्मा बनसोडे यांनीदेखील या दवाखान्याला आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्याची मागणी केली.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दवाखान्याच्या उदघाटनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. महेश खलिपे यांनी केले. प्रसाद जगदाळे, चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी आभार मानले.