नवी दिल्ली : 18व्या लोकसभेच्या प्रारंभापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात देण्यासारखे काही नवीन नव्हते. त्यांनी नेहमीच्या प्रथेपेक्षा लांब भाषण केले. ते विसरले की गेल्या 10 वर्षातील अघोषित आणीबाणी जनतेने लोकसभा निवडणुकीत संपुष्टात आणली, अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रत्युत्तर दिले.
तसेच देशातील लोकांना अपेक्षा होती की, मोदी महत्त्वपूर्ण विषयांवर बोलतील पण तसे झाले नाही. लोकांना केवळ भाषण नव्हे, तर कामही हवे आहे. आम्ही सभागृहात, रस्त्यावर आणि जनतेसमोर त्यांचा आवाज उठवत राहू, असा हल्लाबोलही त्यांनी केला. खर्गे म्हणाले, नरेंद्र मोदीजी, तुम्ही विरोधी पक्षांना सल्ला देत आहात. तुम्ही आम्हाला 50 वर्षे जुन्या आणीबाणीची आठवण करून देत आहात, पण तुम्हाला गेल्या 10 वर्षांच्या अघोषित आणीबाणीचा विसर पडला आहे, जी जनतेने संपवली होती.
लोकांनी मोदींच्या विरोधात जनादेश दिला आहे. असे असतानाही ते पंतप्रधान झाले असतील तर त्यांनी काम करावे. ते आज गरजेपेक्षा जास्त बोलले आहेत. यालाच म्हणतात “सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. देशातील लोकांना अपेक्षा होती की, मोदी महत्त्वपूर्ण विषयांवर बोलतील पण तसे झाले नाही. नीट आणि इतर भरती परीक्षांमधील पेपर फुटीबद्दल ते बोलतील किंवा तरुणांबद्दल थोडी सहानुभूती दाखवतील, असे वाटले होते. परंतु त्यांच्या सरकारने केलेल्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबद्दल कोणतीही जबाबदारी त्यांनी घेतली नाही.
तसेच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेबाबतही पंतप्रधान मौन बाळगून आहेत. मणिपूरमध्ये गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. परंतु, पंतप्रधान मोदी ना तिथे गेले आहेत, ना त्यांनी आपल्या भाषणांमधून तेथील परिस्थितीबाबत कोणतीही चिंता व्यक्त केली आहे, अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारला घेरले.