पारनेर, {संतोष सोबले} – पारनेरसह वाड्या-वस्त्या व तालुक्यातील चारही मंडलामध्ये यावर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नद्या, नाले, ओढे, बंधारे, विहिरी, कूपनलिका भरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सरुवात केली आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील पारंपरिक पीक असणारे व कमी दिवसांत येणारे वाटाणा व मूग पीक सर्वाधिक घेतल्याचे दिसत आहे.
काही भागात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. काही भागात पावसाने अद्याप उघडीप न दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. चालूवर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर जून महिन्यात दि. ८ व दि.९ रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली.
बऱ्याच वर्षांनंतर वेळेत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. पहिल्याच पावसात ओढे, नाले, केटिवेअर दुथडी भरून वाहू लागले. या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली.
खरीप हंगामातील मुग व बाजरी बियाणांना बाजारभाव वाढल्याने मुग २०० ते २५० रुपये प्रतिकिलो तर बाजरी ५०० ते ७५० रुपये प्रतिकिलो तर वाटाणा ७ ते ७.५ हजार प्रति ४० किलो प्रति बॅग, कांदा २ हजार ते २५०० रूपये किलोने खरेदी करावे लागत आहे. हे महागडे बियाणे खरेदी करून शेतात वापसा होताच खरीप हंगामाची पेरणी केली जात आहे.
गेली दोन वर्षे खरीप हंगाम वाया गेल्याने बियाण्यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, कमी कष्टात व नगदी पीक म्हणून मुग या पिकाकडे पाहिले जाते. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसणार असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
पारनेर तालुक्यात जिरायती पट्ट्यात संपूर्ण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर कान्हूर पठार, किन्ही, सुपा, हंगा, जामगाव, लोणी हवेली, भाळवणी, दैठणे गुंजाळ, ढवळपुरी, मुंगशी, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी आदी ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील मुग,
बाजरी, वाटाणा, तूर, जनावरांसाठी मका, कडवळ, घास आदींची पेरणी व सोंगणीला वेग आला आहे. हंगा नदी दुथडी भरून वाहिल्याने तसेच ओढे, नाले, केटिवेअर पाण्याने तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.