Manoj Jarange । विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून राज्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभूत झाला होता. या पराभवा मागे मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे हे दोन फॅक्टर महत्वाचे ठरले होते. मात्र, यानंतर येत्या १२ जुलैला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना तातडीने विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
यावर आता मनोज जरांगे यांनी प्रसारमध्यमांशी बोलताना भाष्य केले. ते म्हणाले,’या निर्णयाला वाईट म्हणायचं काम नाही कारण नाही किंवा चांगलं म्हणायचं काम नाही. मी स्वागत केल्याने न केल्याने त्यांना काही फरक पडणार आहे का? पडणार असेल त्यांच्यामध्ये फरक तर आम्ही पंकजा मुंडे यांचं कौतुकच करु.’
ते पुढे म्हणाले, पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. त्यांनी आणि त्यांच्या समाजाने काय समजून घ्यावं, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही काही जातीयवादी नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत पाडा असेदेखील म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहणार आहोत. एकजुटीने आम्ही आरक्षणासाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार, असे जरांगे यांनी म्हटले.