मंचर, (प्रतिनिधी)- कळंब (ता. आंबेगाव) येथील शेतकरी संजय उर्फ नागेश गेनभाऊ भालेराव यांच्या कळंबई गावठाण येथील स्वमालकीच्या कांदा बराखीतून तार, जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री अंदाजे दहा ते बारा गोणी कांदा चोरून नेला आहे.
यामध्ये शेतकरी संजय भालेराव यांचे अंदाजे 20 ते 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भुरट्या चोरांचा मंचर पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव यांनी केली आहे.
कांद्याला गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये 30 ते 40 रुपये किलो दरम्यान दरवाढ झालेली असल्यामुळे बहुतांशी शेतकरी मंचर बाजार समितीमध्ये कांदा नेत आहेत. याचाच फायदा घेऊन भुरट्या चोरांनी शेतकरी बांधवांचे कांदे चोरण्याकडे मोहीम वळवल्याचे दिसून येत आहे.
दिवसा-रात्री वाडी वस्तीवर अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याची पूर्ण शहानिशा नागरिकांनी करावी. दिवसभर राबराब कष्ट करायचे आणि संध्याकाळी शेतमालाचे राखण करायचे. शेती माल चोरी होऊ लागल्याने त्याची राखण करण्याची शेतकर्यांवर येऊ लागली आहे. शेतकर्यांच्या हाता तोंडाचा घास हे अज्ञात भुरटे चोरटे हिरावून नेऊ लागले आहे.