नेवासा, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत कांदा खरेदी करताना येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडण्याचे काम शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत भेट घेऊन नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावात नगर- नाशिक असा दुजाभाव होत असल्याची गंभीर तक्रार केली. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाशिकप्रमाणे भाव देण्याची मागणी यावेळी लोखंडे यांनी मंत्री जोशी यांच्याकडे करत निवेदन दिले.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यानुसार भाव मिळावा तसेच सदर कांद्याचा दर हा दैनंदिन मार्केटनुसार बदलत असताना त्याप्रमाणे भाव वाढ मिळण्याची मागणी माजी खासदार लोखंडे यांनी केली.
यावेळी सकारात्मकता दर्शवत लवकरच नगर जिल्ह्याकरीता नाशिक जिल्ह्याचा दर दिला जाईल तसेच दररोज भावात बदल होत असल्याने नगर जिल्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळण्याची ग्वाही मंत्री जोशी यांनी दिली.
या चर्चवेळी सचिव निधी खरे आणि चंद्रा उपस्थित होत्या. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा भाववाढीच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.