पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेकडो वर्षांची अखंड परंपरा जपत आषाढी वारीसाठी पंढरीकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी रात्री पुण्यात विसावला. श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरपुरी प्रस्थान ठेवतील.
उद्योगनगरीतून प्रस्थान झालेल्या तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास; तर गांधीवाड्यातून प्रस्थान झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सायंकाळी साडेसातच्या सुमारास संगमवाडी येथील पाटील इस्टेट चौकात आगमन झाले.
दोन्ही संतांच्या पालख्या पुणे हद्दीत आल्यानंतर महापालिका आयुक्त आणि प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, उपायुक्त माधव जगताप, किशोरी शिंदे, नगरसचिव योगिता भोसले आदींनी स्वागत केले. यावेळी सर्व दिंडीप्रमुखांचे महापालिकेतर्फे स्वागत करण्यात आले.
टाळ-मृदंगाचा ठेका, डोईवर तुळस, हाती विणा आणि मुखी हरिनाम अशा गजरात भागवत धर्माची पताका फडकवत येत असलेल्या वैष्णवांच्या मेळ्याने पुण्यातील वातावरण भक्तीमय झाले. पालख्यांबरोबर दिंड्याही आपापल्या ठरलेल्या ठिकाणी मुक्कामी गेल्या.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी आहेत. सोमवारी पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे. दिवसभरात भक्तांना पालख्यांचे दर्शन घेता येणार आहे.
तुकोबांच्या पालखीचे आगमन शहरात प्रथम झाले. यावेळी फर्गसन रस्त्यावर त्यांच्या रथाचे सारथ्य केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. तुकाराम पादुका मंदिरात मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती झाली.
फर्गसन रस्त्यावर तुकाराम पादुका आणि ज्ञानेश्वर पादुका मंदिरात आरती झाल्यानंतर दोन्ही पालख्या खंडुजीबाबा चौकातून लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली.
पालख्यांमध्ये सुमारे तीन तासांचे अंतर
संत तुकारामांची पालखी सायंकाळी पाच वाजता पाटील इस्टेट येथे आली. तर, सुमारे पावणेतीन तासांनी संत ज्ञानेश्वरांची पालखी चौकात आली. त्यामुळे दोन्ही पालख्यांमध्ये बरेच अंतर पडले. या अंतरामुळे यंदाही दोन्ही संतांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तांना अनुभवता आला नाही.
अलोट गर्दी
पालखी मार्गावर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. गर्दीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी विश्वस्तांकडून स्वयंसेवकांचे कडे आणि पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते.
पावसाच्या सरींमध्ये वैष्णव चिंब
दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन होताच पावसाच्या हलक्या सरींनी वैष्णवांचे स्वागत केले. विश्रांतवाडी, संगमवाडी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अशाही वातावरणात या दिंड्या “ज्ञानोबा…माउली…तुकाराम’ असा जयघोष करत मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या.