नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. तसेच लाडली बहन योजना, वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर अशा मोठ्या घोषणा सुद्धा केल्या आता या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका केली जात आहे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आजचं बजेट म्हणजे चादर लगी फटने और खैरात लगी बटने, अशी टीका केली. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,’जयंतराव काय म्हणाले, लोकसभा में चादर फट गयी. अरे पण फाटली कुणाची? मोदी तर पंतप्रधान बनले. तुम्ही जंग जंग पछाडलं. पण मोदींना हटवू शकले नाही, असा टोला लगावतानाच अरे ये हरलेले लोक पेढे वाटतात वेड्यासारखे. तुम्ही कशाला पेढे वाटता? विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून? विजयराव (वडेट्टीवार) जरा त्यांना समजवा, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ते पुढे म्हणाले,’काल आम्ही भगिनी, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी, वारकऱ्यांसाठी योजना आणल्या. काल मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. तुमचे चेहरे पांढरे फटक झाले होते. अर्थसंकल्प झाल्यावर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे विजय वडेट्टीवार नव्हते. कारण सरकार देणारं आहे. त्यांच्याविरोधात कसं बोलणार असं त्यांना वाटलं म्हणून ते गेले नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी खोटं नरेटीव्ह पसरवला. त्यांना वाटलं आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. पण कालच्या अर्थसंकल्पामुळे त्यांचा सुपडा साफ झाला होता. आमच्या घोषणानंतर विरोधक हतबल झाले.’ असेही ते म्हणाले आहे.