प्राचीन पुरातन काळापासून पृथ्वीला वंदन करणारी आपली संस्कृती आहे. सस्यश्यामलम्, सुजलाम, सुफलाम असे जिचे वर्णन कविवर्यांनी केलेले आहे ती आपली माता आपल्याकडूनच दुखावली गेलेली आहे का, हा प्रश्न निकडीचा, विचार करायला लावणारा आहे.
आपण निसर्गप्रेमी आहोत. मनुष्यप्राण्यांप्रमाणे निसर्गाला जीवभावना असल्याची आपली भावना आहे. निसर्ग पूजनीय, वंदनीय आहे. आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. दैनंदिन जीवनचर्येतील प्रमुख घटक आहे. सूर्य, चंद्र, वरुण, आकाश, पर्वत, नद्या आपल्याला पूजनीय आहेत. तसेच पृथ्वी, वसुंधरा ही आपल्याला श्रद्धेच्या ठिकाणी आहे.
आपल्याकडील कोणत्याही पूजेत पृथ्वी पूजा श्रेष्ठ आणि अग्रक्रमात आहे. पृथ्वीचे महत्त्व अनादी काळापासून आहे. पृथ्वी जिला वसुंधरादेखील म्हणतात ती स्त्रीतत्वाची आहे, म्हणूनच तिला धरतीमाता म्हणतात. ती आपले अनेक अपराध पोटात घालते. म्हणून प्रात:वचनात किंवा प्रात:स्मरणात तिचा उल्लेख आहे. प्रथम तिला वंदन केले जाते. आपल्या देशात तर मातृभूमी, भारतमाता म्हणतात. या पृथ्वीमातेचा आपण एक अंश आहोत. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. आशिया खंडातील एका देशाचे आपण रहिवासी आहोत.
आपल्या धर्मग्रंथात पृथ्वीला एक व्यक्ती मानलं जातं. रामायणात तिला सीतेची जननी म्हणून गौरविण्यात आलेलं आहे. म्हणजे तिची व्यक्तिरेखा अनन्यसाधारण आहे. सीतेचा शेवटही धरणीमातेच्या उदरात झालेला आहे; तर महाभारतात महायुद्धाच्या वेळी अंगराज कर्णाचे रथचक्र गिळून तिने धर्माला न्याय दिलेला आहे. अनेक कथा, गीतांमध्ये पृथ्वीचे गुणवर्णन दिसून येतं.
अशा सर्व पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या पिढीची भूमिका काय आहे? आपल्याला ती वंदनीय आहे, महत्त्वाची आहे. कोणत्याही घरबांधणीच्या आधी चांगलासा मुहूर्त पाहून आपण भूमिपूजन करतोच करतो. हे खरं आहे. तरीपण कुठेतरी काहीतरी चुकतंय ही भावना मनातून जात नाही. आज वातावरणातील असंतुलन, भूकंपाचे हादरे, डोंगरकडे कोसळणे ही सर्व त्याची उदाहरणं आहेत.
पृथ्वीवर जलवर्षाव करणाऱ्या पावसाने गेल्या काही वर्षांमध्ये प्रलंयकारी रूप घेतलेले पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी केदारनाथ दुर्घटना आज आपल्या मनाला भयभीत करते. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याच जवळ आहेत. का आपण पर्यावरणाचे रक्षण करत नाही? का आपण आपल्याच मातेवर अन्याय करीत आहोत? एक म्हण आहे, खायला काळ अन् भूमीला भार! आज अशीच परिस्थिती आपण आपल्या वागणुकीने दाखवून देत आहोत. जंगलं कापली जात आहेत.
मोठमोठाले पर्वत डोंगर पोखरून रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे. याठिकाणी विचार करू जाता असं वाटतंय की, हे सारं पृथ्वीला पटत नाहीये. युगान युगं लोटली आपण तिला विचारतं नाहीये की, माते तुला काही त्रास होतोय का आमच्या वागण्याचा? म्हणूनच कदाचित ती आपला विरोध अशाप्रकारे नोंदवत नसेल ना? रोज वर्तमानपत्र उघडलं की कुठेतरी दरड कोसळली, भूकंपाचे धक्के बसलेत, तर कुठे रस्ते, पूल कोसळलेत अशा बातम्या वाचायला मिळतात. हा तिचा विरोध तर नसावा, असा प्रश्न खरोखरच विचारधीन आहे.
पृथ्वी ममताळू आहे. ती आपले अपराध नेहमीच पोटात घालते. अपराधांचा वाढता पसारा आवरताना ती अनावर तर होत नाहीये ना? सगळ्याच निसर्गमित्रांनी आपल्याशी सध्या अबोला धरला आहे असं वाटतं!
पंचमहाभूतात पृथ्वी आहे. किंबहुना त्यातही तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, अग्नी अशी ही पंचमहाभूत होत. याचेही काही आपसात संबंध असावेत. कारण त्यांची कार्य एकमेकांवर अवलंबून आहे. परस्परांच्या सहयोगाशिवाय सृष्टीचे निसर्गचक्र चालू शकत नाही. हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन. मात्र, आपल्याकडच्या कवींनी यावर अनेक काव्य रचलेली आहेत. सूर्यमालेतील ग्रह यांच्यातही असा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्यात आपापसात नातं मानलं गेलेलं आहे. आपण देखील सूर्याला आपला पालनपोषण करणारा पालनहार मानतो. त्याची पूजा करतो. त्याला अर्ध्य अर्पण करतो. चंद्राला भाऊ मानतो. मुलांचा तर तो चांदोमामा आहे. खेळगडी आहे. बालहट्ट पुरविणारा आहे. गोष्टीतला नायक आहे. मुलांच्या खोड्या करणारा खोडकर मामा आहे. सूर्य, पूथ्वी, चंद्र यांच्यातही काही अनुबंध आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची “पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता प्रसिद्ध आहे. अतिशय तीव्र भावनांचं उदात्तीकरण यात आहे.
याठिकाणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पृथ्वीला सूर्याची प्रेयसी म्हणतात. तिचे त्याच्यावर अपार अमर्याद प्रेम आहे. इतकं सुंदर काव्य त्यांनी रचलेलं आहे. प्रेमाचं, विरहाचं, वाट बघण्याचं वर्णन, प्रेमातील शक्ती साऱ्या मानवी भावनांचं उदात्तीकरण या कवितेत आहे. यातील पृथ्वी खरोखरंच एखाद्या प्रणयी भावनेनं प्रेरित झालेली विरहिणी आहे. चिरंतन विरहिणीचे उदाहरण म्हणजे पृथ्वी आहे. सूर्य आणि पृथ्वी रोज एकमेकांना दिसतात, भेटतात; पण त्यांच एक होणं शक्यच नाहीये. सूर्यमालेतील अनेक ग्रह पृथ्वीच्या प्रेमात आहेत. आपले प्रेम तिने स्वीकारावे म्हणून ते कायम प्रयत्नशील आहे. पण,
“नको शृंगार तो दुर्बलांचा
तुझी दूरता त्याहुनी साहावे’
अशी पृथ्वी युगानयुगे लोटलीत तरी आजही सूर्याच्या प्रेमाच्या प्रतीक्षेत कायम आहे. अतिशय योग्य शब्द, संयत भावना, कुठेही अतिरेक नाही असे पृथ्वीचे प्रेमगीत. ही कविवर्य कुसुमाग्रजांची प्रेमकविता कित्येक वर्ष लोटलीत तयार होऊन. पण त्यातील प्रेमाचे उदात्तीकरण आजही मोहविते. म्हणतातच ना जे न देखे रवि, ते देखे कवी.
एकंदरीतच अशी पृथ्वी आपल्याला वेगवेगळ्या रूपानं परिचित आहे. आकाशवीरांना ती निळसर दिसली. पण आपण तिला वसुंधरा म्हणतो. हिरवागार शालू नेसलेली धरतीमाता बा. भ. बोरकरांनाही लिहितं करते! श्रावणाला ते पृथ्वीचा सातवा महिना म्हणतात. सर्वत्र हिरवेगार वनराईत पसलेली पृथ्वी एखाद्या गर्भारशीसारखी दिसते. अशा पृथ्वीला धरतीमातेला आपणच पर्यावरणाची रक्षा करून, आहे तशीच ठेवायला हवी ना! यासाठी तिच्यावर अतिरिक्त भार पडणार नाही, तिला दुखापत होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. अशा या जन्ममातेला आपणच समजून घेतले पाहिजे.
– अरुणा सरनाईक