नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून दूर करावे, अशी पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती. भाजपच्या नेत्यांनीही फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता. आता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनीही तुर्त विनंती अमान्य करत काम सुरू ठेवण्याचा आदेशच दिला आहे.
तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईल, असे अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे, कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते.
फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्लाच अमित शहा यांनी फडणवीसांना दिला.