मुंबई – महात्मा गांधींच्या बद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.भिडे यांच्या निषेदार्थ राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलने देखील झाली. गेल्या काही दिवसांमध्ये भिडे हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात भिडे यांची मिशी कापून आणणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत.
नुकतंच भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि राजाराम मोहन रॉय यांच्याबाबत देखील आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले. अशात भिडे यांची मिशी कापून आणेल त्याला एक लाख रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा समता परिषदेच्या जालना येथील माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
भिडे यांना सरकार पाठीशी घालत आहे अशी टीका करत त्यांची मिशी कापून आणणऱ्याला एक लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा वाघमारे यांनी केली. ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यानकडून एक एक रुपया गोळा करून हे एक लाख रुपये देण्यात येतील असंही ते यावेळी म्हणाले.
राज्य महिला आयोगानं दखल घेतली
“संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही हे चुकीचे आहे.
महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे.राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.