वाराणसी : तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज वाराणसी या त्यांच्या मतदार संघात पोहोचले. बनारसच्या स्थानिक बोलीत आपल्या संभाषणाला सुरूवात केल्यानंतर त्यांनी शेतकरी आणि अन्य लोकांचे आभार मानले. काशीच्या लोकांमुळे आपण धन्य झालो असून गंगामातेने जणू मला दत्तकच घेतले आहे. मी आता इथलाच झालो आहे असे भावूक उदगार त्यांनी यावेळी काढले.
ते आपल्या भाषणात म्हणाले की शेतकरी बंधु भगिनींचे जिवनमान समृध्द करण्यासाठी आपले सरकार कटीबध्द आहे. पंतप्रधान म्हणून काशीच्या पवित्र भूमीवरून किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जारी करताना आपल्याला अभिमान वाटतो आहे. हा हप्ता जारी केल्यामुळे ९.२६ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना २० हजार कोटी रूपयांचा लाभ होणार आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी कृषि सखियां म्हणून प्रशिक्षित ३० हजारपेक्षा जास्त स्वयं सहायता गटांना प्रमाणपत्रही प्रदान केले.
पंतप्रधान म्हणाले की देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुका भारतीय लोकशाहीची विशालता, भारताच्या लोकशाहीचे सामर्थ्य, आपल्या लोकशाहीची व्यापकता, आपल्या लोकशाहीची खोलपर्यंत रूजलेली मूल्ये संपूर्ण जगासमोर समर्थपणे दर्शवतात. युरोप आणि युरोपीय युनियनच्या मतदारांची संख्या जरी एकत्र केली तरी भारतीय मतदारांची संख्या त्यांच्यापेक्षा अडीचपट अधिक आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी केला त्याबद्दल मी बनारसच्या सर्व मतदारांचे आभार मानतो. येथील नागरिकांनी मला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले आहे.
ते पुढे म्हणाले की या निवडणुकीत देशातील जनतेने अभूतपूर्व जनादेश दिला. त्यांनी एक इतिहास रचला. जगात लोकशाही देशांमध्ये एखादे सरकार लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून येते हे क्वचितच पाहायला मिळते. मात्र भारतातील जनतेने तेही करून दाखवले. भारतात गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदा असे घडले. हा खूप मोठा विजय आहे, खूप मोठा विश्वास आहे. ही खूप मोठी पुंजी आहे. तुमचा हा विश्वासच मला सातत्याने तुमची सेवा करण्यासाठी, देशाला एका नव्या उंचीवर नेण्याकरता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देत राहील. तुमची स्वप्ने आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत राहील. मी शेतकरी, तरूण, महिला आणि गरिबांनाच नेहमी विकसित भारताचे स्तंभ मानले आहे. आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरूवात मी त्यांच्याच सशक्तीकरणाद्वारे केली आहे. सरकार स्थापन झाल्यावर सगळ्यांत पहिले शेतकरी आणि गरिब कुटुंबाशी निगडीत निर्णय घेण्यात आले आहे. देशातील गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे तयार करणे असो किंवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी चालू ठेवणे असो, हे निर्णय कोट्यवधी लोकांसाठी लाभदायी आहेत.