शिर्डी, {राजेंद्र भुजबळ} – गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून, यामुळे अनेक अपघात घडले आहे. शेकडो नि:ष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या पाच वर्षांत दोनही माजी खासदारांनी या रस्त्यासाठी केंद्रातून शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचा दावा केला होता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा हा रस्ता लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते, मात्र या सर्वांच्या घोषणा आणि आश्वासने हवेतच विरून गेल्या आहे.
आजपर्यंत या रस्त्याच्या कामाचे टेंडर घेणारा एकही ठेकेदार टिकला नसून काहीजण तर चक्क काम सोडून पळून गेले आहे. त्याचे कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी केवळ टक्केवारी आणि कमिशन या दोन कारणानेच कोणताही ठेकेदार टिकत नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे.
ही टक्केवारी लोकप्रतिनिधी मागतात की शासकीय अधिकारी हे शोधणे कठीण नसले तरी राज्यातील सर्वात महत्वाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था नेत्यांना का दिसत नाही, हाच महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघातील गावांशी संबंधित हा राष्ट्रीय महामार्ग आहे.
शेतकरी, विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक, साखर कारखाने यासह श्रीक्षेत्र साईंची शिर्डी व श्रीक्षेत्र शनिशिंगाणापूर याठिकाणी दररोज येणारे लाखो भाविक यांच्यासाठी हा रस्ता महत्वाचा असला तरी आज सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
अपघात, वाहनांचे नुकसान, जोखमीचा प्रवास, शालेय विद्यार्थ्यांना होणारा विलंब अशा महत्वाच्या बाबींचा सर्वच लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे कि, ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, हे मात्र अजूनही समजलेलं नाही.
मात्र हेच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात नगर-मनमाड रस्त्याचं भांडवल करून राजकारण करताना लोकांनी अनुभवलं. लोकांचा संयम सुटला असून नेत्यांवर विश्वासही राहिला नाही. याचा फार मोठा फरक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पडू शकतो.
नगर-मनमाड रस्त्याला लागलेल्या ग्रहणातून नागरिकांना कधी सुटका मिळेल आणि रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? याचं उत्तर मात्र आज रोजी कुणाकडेही नाही हेच खरं दुर्दैव म्हणावं लागेल.