नेवासा – प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यातील त्रुटी दूर करून सरसकट शेतकऱ्यांना विम्याचे रक्कम देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
नेवासा तालुक्यामध्ये खरीप हंगामात २०२३ मध्ये ६२ हजार २२८ शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टर क्षेत्राचा पिक विमा उतरविलेला होता. नेवासा तालुक्यात केंद्र व राज्य सरकार मिळून ३४ कोटींचा विमा सरकारने विमा कंपनीला भरला होता, तालुक्यामध्ये चार महसूल मंडळांना २५ टक्के पिक विमा अग्रिम अंतर्गत १३ हजार शेतकऱ्यांना ९ कोटी विमा रक्कम प्राप्त झालेला होता.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तालुक्यासाठी सर्व महसूल मंडळांमध्ये ११.७५ कोटी रक्कम मंजूर झाल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाली सदर बाबींमध्ये सर्व विमा भरलेले शेतकरी हे पिक विम्यात समाविष्ठ झालेले नाहीत. तांत्रिक कारणास्तव शेतकरी विहित कालावधीत तक्रार न करू शकल्याने विमा कंपनीकडून सदर तक्रारी नाकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीलेले असल्याची माहीती यावेळी माजी आमदार मुरकुटे यांनी मुख्यमंञी शिंदे यांच्या निदर्शनास आणून देवून सरसकट विमा देण्यााची मागणीही यावेळी त्यांनी केली.
अवकाळी पावसामध्ये नेवासा तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये या वर्षी खरीप हंगाम चालू झालेला आहे. मात्र शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पिक विमा न मिळाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे तरी आपण आपल्या स्तरावरून पिक विमा कंपनीला व शासनाला आदेशित करून लाभधारक शेतकरी वंचित राहू नये यामध्ये काही त्रुटी असल्यास सुधारणा करून शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्मंत्र्यांकडे निवेदन देऊन चर्चा केली असता तालुक्यातील पीक विमा पासून एकाही मंडळ वंचित राहणार नाही पुढील काही दिवसात हा प्रश्न निकाली लावण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.