मुंबई : अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केले आहे. माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे त्या म्हणाल्या. चाकणकर म्हणाल्या, 2019 मध्ये मी खडकवासलामधून उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते.
लोकसभेत खडकवासलामधून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण तरीही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल’, असे त्या म्हणाल्या. तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत जात आहेत. या वारीत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांवर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आरोग्यवारी अभियानाचे उपक्रम राबवण्यात आला आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोयीसुविधा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते, असे त्या म्हणाल्या.
जितेंद्र आव्हाडांना महत्व द्यायची गरज नाही
शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहीण योजना या योजनेवर दिलेल्या प्रतिक्रियेवर रूपाली चाकणकरांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना निवडणुकीत बाजूला ठेवले होते. त्यांच्या वक्तवल्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे, असे चाकणकर म्हणाल्या.