आळंदी, {एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड} –
माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा शनिवारी (दि. 29) सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे. माऊलींचा पालखी सोहळा राज्यात सर्वात मोठा आहे.
या सोहळ्यात लाखों वारकरी भाविक सहभागी होऊन माउलींसोबत पंढरपूरला पायी चालत जातात. प्रस्थान सोहळ्याला येणार्या लाखांवर वारकर्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आळंदी प्रशासन आता सज्ज झाले आहे.
शहरात विविध ठिकाणी पोलीस मदत केंद्र, आरोग्य बुथ उभारण्यात आलेत. सुरक्षेसाठी गर्दीवर करडी नजर ठेवण्यासाठी गर्दीच्या होणार्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आलीय.
जनजागृतीसाठी फलक लावण्यात आलेत. इंद्रायणी घाटावर महिलांसाठी तात्पुरत्या चेजिंग रुम उभारल्यात. पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त टँकर तैनात करण्यात येत आहेत.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि. 29) तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे शुक्रवारी (दि. 28) प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 25) आळंदी पोलीस ठाण्यात बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार, अधिकारी यांना पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदीचे वरीष्ठ निरीक्षक भीमा नरके यांनी आवश्यक सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या ठिकाणाहून पालखी जाणार आहे, त्या मार्गावर इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
तसेच पालखी मार्गावर कोणीही आपली वाहने पार्क करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी स्थानिक नागरिक व वाहन चालकांना केले आहे.
मात्र या बंदीतून अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चोरटे या गर्दीत मिसळून मोबाइल पाकीट, सोन्याचे दागिने लंपास करतात.
यामध्ये महिला चोरट्यांचाही सहभाग असतो. ही बाब लक्षात घेऊन साध्या आणि वारकर्याच्या वेशातही पोलीस असणार आहे.
एखादा संशयित दिसला की त्याला लगेच ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच परिसरताील रेकॉर्डवरील गुंडांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. वारीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी टॉवरवरून पोलीस गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत.
असा असेल देहू आणि आळंदीचा बंदोबस्त –
-पोलीस उपायुक्त : 6
-सहायक पोलीस आयुक्त : 17
-पोलीस निरीक्षक : 103
-सहायक निरीक्षक /उपनिरीक्षक : 345
-अंमलदार : 3459
-आरसीपी पथक : 5
-एसआरपीएफ : 3 कंपन्या
-स्ट्रायकिंग फोर्स : 3
-क्यूआरटी : 1
-एनडीआरएफ : 2 तुकडी
-बीडीडीएस : 4 टीम
वारीसाठी तैनात आळंदी नगरपरिषद यंत्रणा:
15 अधिकारी
200 कर्मचारी
150 स्वयंसेवक
15 टँकर्स (पिण्याच्या पाण्यासाठी)
18 टँकर्स (फिरते टॉयलेट्स ना पाणीपुरवठा)
20 सक्शन मशीन
10 घंटागाड्या
5 ट्रॅक्टर
1 रस्ता सफाई मशीन
3 अग्निशमन वाहने
3 रेसक्यू बोट
130 सीसीटीव्ही कॅमेरे
1800 फिरते शौचालय
माऊलींच्या रथाची तीसरी चाचणी यशस्वी
दरवर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्यासाठी नवीन बैलजोडी निवडली जाते. तसेच वर्षभर रथ एका जागी बसून असल्याचे त्याची आवश्यक डागडुजी केली जाते. रथाच्या आवश्यक डागडुजीनंतर मंगळवारी (दि.25) मानाची बैलजोडी जुंपून माऊली भक्तनिवास ते चर्होली फाटा (पुणे रस्ता) अशी पालखी रथाची 6 किमी तिसरी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली.
यादरम्यान कोणतीही समस्या आढळली नसल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले. याआधी 11 आणि 21 जून रोजी चाचणी घेण्यात आली होती. आवश्यकतेनुसार अजून दोन दिवसांनी आणखी एक चाचणी घेण्यात येणार आहे.
श्रींच्या खादेकर्यांची संख्या 200 निश्चित
पालखी प्रस्थानादिवशी माऊली मंदिरात पालखी घेण्यासाठी आळंदीतील काही ग्रामस्थांना मान आहे. यावेळी पालखी खांदेकर्यांची संख्या 200 इतकी निश्चित करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन, देवस्थान विश्वस्त, खांदेकरी यांची माऊली भक्त निवास येथे बैठक पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणार्या वारकर्यांना आवश्यक सोयिसुविधा पुरविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक असे 350 पेक्षा अधिक मनुष्यबळ तैनात असणार आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वारकर्यांच्या सेवेसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. – कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद