छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकारच्या काळात देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही, त्यापेक्षाही जास्त निधी महायुती सरकारमध्ये मिळाला, असे म्हणत सरकार मुस्लिम समाजासाठी काम करत आहे, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
सत्तार म्हणाले, सध्या फक्त मुख्यमंत्री शिंदे यांची हवा आहे. मी पैलवान असून कुणासोबत तरी लढायचे आहे. मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली असून आम्हाला योग्य न्याय मिळेल, असा विश्सवासही सत्तारांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल. जेव्हा मुख्यमंत्री शिंदे म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यादिवशी आमचा करार संपेल असे त्यांनी म्हटले आहे. सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेनंतर टोपी काढणार
एकनाथ शिंदेंचे महाराष्ट्रात 9 रत्न होते. मात्र त्यातील आता एक रत्न कमी झाले असून आम्ही 8 राहिलो आहोत. त्यात मी देखील आहे. यातील एक रत्न आम्ही दिल्लीला पाठवले आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर मी टोपी काढेल असे म्हणणाऱ्या सत्तारांनी विधानसभेनंतर टोपी काढणार असल्याचे म्हटले आहे.
जिल्ह्यातीलच पालकमंत्री
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री याच जिल्ह्यातील असणार आहे. या १०० दिवसांच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. मुख्यमंत्री म्हणाले तर केव्हाही पालकमंत्रिपद स्वीकारेन, असे सत्तार म्हणाले.