Mukesh Khanna । Ayodhya | Lok Sabha Result 2024 – केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार बनताना दिसत असले तरी भाजपला यावेळी अत्यंत कमकुवत अशा प्रकारचा जनादेश मिळाला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पक्षाने अत्यंत जोरकसपणे निवडणुकीत लावून धरला होता.
प्रभू रामाच्या नावावर मतेही मागण्यात आली होती. हे मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा गेमचेंजर ठरेल अशी भाजपला अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नसल्याचे किमान उत्तर प्रदेशच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
प्रतिष्ठापना सोहळा जानेवारी महिन्यातच झाला होता. उत्तर प्रदेशच्या सर्वच्या सर्व ८० जागा पटकावू असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. तथापि, असं काहीच घडलं नाही आणि भाजपचे उमेदवार पराभूत झाले.
अयोध्येचा निकाल पाहता विविध क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीसुद्धा अयोध्येच्या निकालावर संताप व्यक्त केला होता. गायक सोनू निगम याने देखील नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर आता ‘शक्तीमान’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांची पोस्ट चर्चेत आली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राम मंदिराचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अयोध्येत भाजपच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
ते म्हणाले, ‘अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवं की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवावेत, मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू शामचं मंदिर असो..
View this post on Instagram
श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका. तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या’, असं त्यांनी लिहिलं. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून, ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.