पुणे – भारतीय संघात एकेकाळी महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या एमपीएलमधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधव याने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन राज्यातील तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला. त्यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूर टस्कर्सचे मालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला.
राज्यात एमपीएलचा दुसरा हंगाम सुरु झाला असून सलामीच्या सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यात झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केदार जाधव यांनी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षीच्या पहिल्या हंगामातही केदार जाधव यांनीच कोल्हापूर टस्कर्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. परंतु त्यांच्या निवृत्तीमुळे संघमालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधार म्हणून घोषणा केली.
“कोल्हापूर टस्कर्स संघासाठी आजचा दिवस कठीण आणि वेगळा आहे. केदार जाधव यांची निवृत्ती ही आम्हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती. ते केवळ एक खेळाडूच नाही तर माझे चांगले मित्र आहेत. आज त्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी क्रिकेटच्या मैदानाशी आणि क्रिकेटशी त्यांचं नातं कायम राहील, असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
– पुनीत बालन (युवा उद्योजक व संघमालक, कोल्हापूर टस्कर्स)
आता राहुल त्रिपाठी आणि उपकर्णधार श्रीकांत मुंडे ही जोडगोळी कोल्हापूर टस्कर्सला कोणत्या दिशेने घेऊन जातेय याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. केदार जाधव यांनी खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अलीकडच्या काळात त्यांनी मराठीमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे क्रिकेट समालोचक म्हणून त्यांची क्रिकेटच्या मैदानातील नाळ कायम राहते की नाही, हे येणाऱ्या काळात लवकरच दिसेल.