Monsoon Session 2024 । उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असताना सरकार गंभीर नसल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे.
अशात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले,’हे सरकार विश्वासघातकी सरकार असून देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरंतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तेच 2024 ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं. असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्कारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.’ असं म्हणत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करतांना ते म्हणाले,’खरंतर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर 18 टक्के जीएसटी लावतं, दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5 टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3 टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना 2 टक्के जीएसटी, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार आहे हे सिद्ध झालं आहे. जीएसटी कुठे लावावी हे या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भानसुद्धा नाही. अत्यंविधीच्या प्रत्येक सामानावर सरकारने 18 टक्के जीएसटी लावली आहे. त्यामुळे आता या सरकारने मरण ही महाग केलंय का? हा प्रश्न उपस्थित होतोय. युरियाची पिशवी 50 रुपयाला मिळायची. ती आता 150 रुपयांवर केलीय. तसेच 50 किलोची युरियाची पिशवी आता 40 किलोची केलीय. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या करावं, हा चंगच या सरकारने बांधला आहे”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.