Sanjay Raut | संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आम्ही सगळे मिळून 240 खासदार आहोत. हे सगळे मिळून 240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
संजय राऊत म्हणाले की, “आज इंडिया आघाडीचे सर्व नवनिर्वाचित खासदार हे संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील. प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातात संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या संदेशासह 240 खासदार संसदेत प्रवेश करतील. आता मोदी- शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की, विरोधी पक्ष काय असतो.”
240 चे 275 कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही
पुढे ते म्हणाले, “गेल्या 10 वर्षात विरोधी पक्षाला चिरडण्याच्या प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष प्रचंड ताकद घेऊन संसदेत जात आहे. मोदी-शाह यांच्या समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. काँग्रेसचे 100 हून अधिक खासदार, आम्ही सगळे मिळून 240, हे सगळे मिळून 240 चे 275 कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही,” असा थेट इशाराच संजय राऊत यांनी मोदी-शाहांना दिला. Sanjay Raut|
राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला टोला
विरोधी पक्ष नेत्याच्या नावाबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, “लोकशाही आणि संविधान या मार्गाने काही निवड कराव्या लागतात. त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही की, कोणाला कधीही नेमले जाईल आणि बहुमत नसतानाही पंतप्रधानपदाची शपथ घेतील,” असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. Sanjay Raut|
महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना निधी द्या. तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केली आहे. आता या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? हे पहावे. सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, कर्जमाफी करावी,” अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएचे सरकार स्थापन
लोकसभा निवडणुकीत टीडीपीने 16 आणि जेडीयूने 12 लोकसभेच्या जागा जिंकल्या, त्यांचा पाठिंबा भाजपसाठी महत्त्वाचा ठरला. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात एनडीएचे एकूण 294 प्रतिनिधी आहेत, तर इंडिया आघाडीकडे 240 जागा आहेत.
हेही वाचा: