आळंदी, {एम. डी. पाखरे} – घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥
माऊलींचे निस्सीम भक्त, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, अखिल भाजी मंडई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, संत भोजलिंग काका सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष स्व. नानासाहेब भिकोबा गरुड यांनी 40 वर्षापूर्वी माऊलींची पालखी पुष्पसजावट सेवेचे व्रत घेतले होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय ही सेवा पुढे कायम ठेवत आहेत.
नानासाहेब गरुड यांनी 36 वर्षे माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा तब्बल 32 दिवसांचा पायी प्रवास करीत असताना नियमित पालखीची पुष्प सजावट ही स्वखर्चातून करीत होते. शनिवारी (दि. 29) माऊलींचा प्रस्थान सोहळा तर रविवारी (दि. 30) पालखी सकाळी पंढरीच्या वाटेवर पुणे मुक्कामासाठी रवाना होणार आहे.
त्यासाठी गेली 40 वर्षांची पालखी सजावटीची परंपरा कै. नानासाहेब भिकोबा गरुड यांचे तीन पुत्र संदीप, प्रदीप, सुदीप हे आपल्या वडिलांच्या पालखी सोहळ्यातील सेवा यापुढे देखील कायम ठेवणार आहेत. प्रस्थानानिमित्त माऊलींचे महाद्वार हे विविध रंगीत, सुगंधी फुलांनी सजविण्यात येते. महाद्वाराला तोरण बांधून माऊलींच्या पादुकांना हार अर्पण करून पुष्प सजावटीची सुरूवात केली जाते.
प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखीची नियमित पहाटे तीन ते पाच या वेळेत पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्याचे काम करण्यात येते. स्व. गरुड हे पालखी सजावटीचे काम तसेच दरवर्षी लोणंद येथे वारकर्यांना ते वारकर्यांना भोजन पंगत घालत असत. तीही परंपरा त्यांच्या तीन मुलांनी पुढे सुरू ठेवली आहे.
सोहळ्यात दररोज फुले पोहोचवली जातात –
माऊलींची पालखी नियमित रंगीबेरंगी व सुगंधी फुलांनी सजविण्यासाठी पुणे येथील मार्केट यार्डमधून दररोज फुलांची खरेदी करून पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल तिथपर्यंत फुले पोहोचवली जातात. यासाठी 8 ते 10 कारागीर पुष्प सजावटीचे काम पालखी पुढे मार्गस्थ होण्यापूर्वीच पूर्ण करतात.
त्यासाठी कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला तसेच जेवणाची व्यवस्था गरुड परिवाराकडून केली जाते. यासाठी महिनाभर होणारा खर्च स्वतः गरुड परिवार आजवर करीत आला आहे. तसेच यापुढेही केले जाणार असल्याचे गरूड कुटुंबीयांनी सांगितले.
शुक्रवारी मध्यरात्री होणार कामाला सुरुवात
शुक्रवारी मध्यरात्री महाद्वार हे विविधरंगी सुगंधी फुलांनी सजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजतापासून पालखीची सजावट करण्यात येईल.
तसेच पालखी आजोळ घरातील पहिला मुक्काम आटोपून पंढरपूरडे मार्गस्थ होईल, त्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सजवली जाईल. तसेच वडिलांचा हा सेवेचा वारसा यापुढे देखील आम्ही सुरू ठेवणार आहोत असे गरूड भावडांनी सांगितले.