Manoj Jarange । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये दगडफेकीची घटना समोर आली आहे. यावर आता लक्ष्मण हाके यांनी बीडच्या तेलगाव माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले,’लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये. शांत राहा, गावाची शांतता बिघडू नका, असे आवाहन हाके यांनी केले आहे. मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध त्यांनी केला.
आम्ही उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आम्ही आमची मागणी मागत आहोत. तरुणांनी कुठलाही कायदा हातात घेवू नका. दगडफेक आणि रस्ता रोको करु नका. गाडी फोडून दहशत माजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतील तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो. संविधानावर विश्वास ठेवा, भीती बाळगू नका. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था ठेवावी. लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. रोज एकमेकांची तोंड पाहायची आहेत. भांडण आणि हिंसा हा उपाय नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
दरम्यान, दगडफेकीनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. ही दगडफेक नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दगडफेकीची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बीडच्या मातोरी तालुका शिरूर कासार येथील बस स्टॅण्डवर ही दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीमध्ये दुचाकी तसंच डीजेचे नुकसान झालं असून काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर चकलंबा पोलील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीच्या घटनेमुळे बीडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
डीजे वाजण्याच्या कारणावरून या गावात दोन गट आमने सामने आल्याने ही दगडफेक झाल्याचे समजत आहे. यात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक महिती आहे. यात काही दुचाकी फुटल्या आहेत. तर डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. सध्या मातोरी गावात तणाव पुर्ण शांतता आहे.