देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढीवारी पायी पालखी सोहळा शुक्रवारी (ता. २८) श्री क्षेत्र देहूमधून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या हरी नामाच्या गजरात दाखल झाल्या आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थानासह प्रशासन, विविध सामाजिक संस्था-संघटनांही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. तर, हा सोहळा अनुभवण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी इंद्रायणी तीरावर वारकऱयांची मांदियाळी झाली आहे.
शुक्रवारी (दि. २८) दुपारी २.३० च्या सुमारास पालखी प्रस्थान ठेणार असून सायंकाळी इनामदार वाड्यात मुक्काम तर, शनिवार (दि. २९) तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. तीर्थक्षेत्र देहूमध्ये दाखल झालेल्या या दिंड्या व भाविक वारकऱ्यांमुळे परिसर भक्तीमय बनला आहे.
वारकऱ्यांच्या खांद्यावरील पताका, डोक्यावरील तुळशी वृंदावन आणि टाळ – मृदुंग वीणा, मुखी हरिनाम, इंद्रायणी नदी घाट, मोकळ्या जागा तसेच रहिवाशांच्या व सोसायट्यांच्या मोकळ्या जागेवर ठिकठिकाणी दिंड्यांचे सुरू असलेले टाळ, मृदुंगाच्या गजरामध्ये कीर्तन, भजन, हरी नामघोष सुरू असल्याने परिसरातील वातावरण भक्तीमय बनले आहे.
वाहनांना प्रवेश बंदी
प्रस्थान व मार्गस्थ दिनी दिवसभर देहूत येणाऱ्या सर्व मार्गावर म्हणजेच देहूरोड ते देहू, आळंदी मार्गे तळवडे,चाकण-तळेगाव महामार्गावरील देहूफाटा मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. देहूत प्रवेश करणाऱ्या चौक, काळोखे चौक भैरवनाथ चौक साईराज चौक आयटी पार्क तळवडे आदी भागात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
रस्त्याच्या दुर्तफा उभ्या वाहनांवर, रस्त्यावरच लावण्यात येणाऱया हातगाडया, पथारीवाले यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, परिचारीका, पुरेसा औषध साठा, विविध चार ठिकाणी बाहयरूग्ण विभाग उभारण्यात आले असून रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत.
२४ तास पाणी
देहू नगरपंचायतीच्या वतीने चोवीस तास अखंडीत शुद्ध पाणी पुरवठा आहे.. १२०० फिरते शौचालय उभारण्यात आले असून सुलभ शौचालय यात्रा काळात मोफत करण्यात आले आहे. १५ पाण्याचे टँकर उपलब्ध असून आणखी टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्वच्छता, साफसफाई, औषध, धूर फवारणी, डी. डी .पावडर टाकण्यात येत आहे. तसेच नगरपंचायत कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण पथक आणि सर्व सूचना व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सज्ज करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली आहे.