Maharashtra Budget Session 2024-2025 । Devendra Fadnavis | Uddhav Thackeray : अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत. तरीदेखील जनता त्यांच्या थापांवर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही.
महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र हे उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेलेलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या याच टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उद्धवजी हा अर्थसंकल्प थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शिवाय आम्ही जे जे बोललो ते ते सर्व वेळेत पूर्ण करुन दाखवू’, असा शब्दही फडणवीसांनी ठाकरेंना दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला नागपूरला जायचं असल्याने मी पहिले बोलायची संधी घेतली आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे. विशेषत: शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही तर आपल्या माय-बापांचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेणारा, महिलांसाठी विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अर्थसंकल्प आहे.
विरोधी पक्षाचे लोक बोलत होते आम्ही टीव्हीवर पाहत होता. मात्र ते बोलताना त्यांच्या बोलण्यात जोर आणि चेहऱ्यावर नूर नव्हता, त्यांचा चेहरा उतरला होता. हा अर्थसंकल्प नवीन इतिहास रचणारा आहे.
शिवाय आम्ही जेजे बोललो आहे, ते ते सर्व वेळेत पूर्ण करुन दाखवू, हा निवडणुकीचा नव्हे तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.