Ajit Pawar | Uddhav Thackeray : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सरकारने राज्यासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बजेटमधून काही महत्वाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
तसेच, राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत.
तरीदेखील जनता त्यांच्या थापांवर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र हे उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेलेलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आमची मागणी आहे की, त्यांनी गेल्या दोन वर्षांत आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्या खरोखर किती अंमलात आणल्या याबद्दल तज्ज्ञांची कमिटी नेमून श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की, ज्या घोषित झाल्या पण प्रत्यक्षात आल्या नाहीत.
या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट असं की, महिलांना जरा मतदानात आपल्या बाजूने करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न दिसत आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा. त्याबद्दल कुठे वाच्यता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘माता-भगिणींना जे देताय ते जरुर द्या. पण त्याचवेळेला एक सांगेल, या देशात हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता-बघिणी त्याला काय उत्तर देणार, या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेच दिसत नाही. रोजगार वाढीसाठी कुठेच उपाययोजना नाही.
शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा, ही मागणी मी केली होती. ती त्यांनी माफ केली. पण शेतकर्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीजबिल माफ केल्यानंतर शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार आहात का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
राज्य सरकारच्या घोषणा….
मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ
राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना होणार असून 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षांतील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे.
जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आल्याचेदेखील अजित पवारांनी यावेळी जाहीर केले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार
यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. तर, गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. १ जुलैपासून ही योजना सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, दर महिन्याला10 हजार रुपयांचा स्टायफंड या तरुणांना दिला जाणार आहे.