मुंबई – देशाची राजधानी नवी दिल्लीसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हवेची गुणवत्ता खालावली आहे. मुंबईसोबतच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील हवा बिघडली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत गेली आहे. यामुळे वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचे आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागले आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी 15 दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास जागच्या जागी “स्टॉप वर्क’ नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ऍण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल.
राज्य एक्यूआय श्रेणी
-अकोला 297 वाईट
-नागपूर 214 वाईट
-धुळे 209 वाईट
-जळगाव 313 अतिशय वाईट
-नांदेड 207 वाईट
-बदलापूर 208 वाईट
-नवी मुंबई 216 वाईट