नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी सज्ज होत असल्याचे सूतोवाच केले. देशात १९६२ या वर्षानंतर प्रथमच सरकारने सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी जनतेचा कौल मिळवल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एनडीएने निसटता विजय मिळवला असला तरी मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. तो विक्रम म्हणजे सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय. ती किमया साधल्यानंतर मोदींनी भाजपच्या मुख्यालयात उपस्थितांसमोर भावना व्यक्त केल्या.
त्यावेळी त्यांनी विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यघटनेला अनुसरून सर्व राज्यांच्या सहकार्याने कार्य करण्याची ग्वाही दिली. सर्व प्रकारचा भ्रष्टाचार समाप्त करण्यावर तिसऱ्या कार्यकाळात भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.