नगर, (प्रतिनिधी) – तीन महामार्ग एकत्र येणारा आणि नगर शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा कायनेटिक चौक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी अन अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनला असून या चौकात सातत्याने छोटे मोठे अपघात होतात.
कायनेटिक चौकात पुण्याकडून तसेच दौंडकडून येणारी वाहने एकत्र येतात. याशिवाय नगरमधून पुणे व दौंडकडे जाणारी वाहनेही एकत्र येतात. या ठिकाणी वाहतूक सिग्नल आहेत. परंतु शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कधी असतात तर कधी नसतात. त्यामुळे वाहतुकीला कुठलीही शिस्त राहिलेली नाही.
अनेक अवजड वाहने आडवीतिडवी घुसून चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. सायंकाळच्या वेळी तर हा चौक ओलांडून जाण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागतो. तसेच या वाहतूक कोंडी मुळे सातत्याने छोटे मोठे अपघात होतात.
या चौकात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्तपणे पुरेशा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
महामार्गावरील अतिक्रमणांकडे मनपाचे दुर्लक्ष
शहरातून जाणारे महामार्ग प्रशस्त होत आहेत. शहरातील अंतर्गत रस्तेही प्रशस्त होत आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीही मिळत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, अपघात टाळता यावेत यासाठी रस्ते प्रशस्त होत असताना दुसरीकड़े या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहे.
त्यामुळे रस्ते प्रशस्त होवूनही वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सुटत नाही. या समस्येला रस्त्यांवरील अतिक्रमणेच कारणीभूत आहेत. मात्र ही अतिक्रमणे काढण्याकडे महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. ही अतिक्रमणे हटवून या रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची आवश्यकता आहे.