हैदराबाद : लोकसभा-विधानसभा निवडणुकीत धुळधाण उडाल्यानंतर वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्यावर भर दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांत झालेल्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दावा केला की, प्रत्येक प्रगत लोकशाहीत मतपत्रिका वापरल्या जातात. तर भारतातच
ईव्हीएमचा आग्रह का धरला जात आहे?
जगन मोहन पुढे म्हणाले की, आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा जपण्यासाठी आपणही त्याच दिशेने वाटचाल केली पाहिजे. न्याय नुसताच होत नाही; तर तो दिसला पाहिजे. तसेच लोकशाही नुसती प्रस्थापित न होता ती दिसायला हवी. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. तर लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ चार जागा जिंकता आल्या. राज्यातील१७५ विधानसभा जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १६४ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत या आघाडीने २५ पैकी २१ जागा जिंकल्या.
हरलेले लोकच ईव्हीमवर आक्षेप का घेतात?
माजी मुख्यमम्त्री जगन मोहन यांच्या वायएसआरसीपी पक्षाला जनतेने साफ नाकारलेले आहे. त्यामुळे जगन मोहन नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. नेहमी निवडणुकीत पराभूत झालेले लोकच ईव्हीएमवर आक्षेप का नोंदवतात? विरोधी पक्षांच्या विजयी झालेल्या एका तरी नेत्याने ईव्हीएमवर अविश्वास दाखवला आहे का, असे प्रश्न तेलुगु देशम पक्षाच्या एका नेत्याने, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर विचारले आहेत.