इंदापूर : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अश्या प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन इंदापूर तालुक्यांमध्ये एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकर्यांनी अर्ज करावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देताना रुपणवर म्हणाले की, कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी इंदापूरतालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धा राबविण्यात येत आहे. यासाठी पात्रता निकष मध्ये, स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),७/१२, ८-अ चा उतारा,जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास बैंक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे.
व अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.अर्ज भरून सहभागी होण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहायक यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले आहे.