T20 World Cup 2024 (IND vs SA Final) : टी-20 विश्वचषक 2024 च्या विजेतेपदाच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहेत. एकीकडे आफ्रिका पहिल्यांदाच विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाने गेल्या 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी आहे, पण शेवटी एकच संघ विजेता ठरेल आणि ट्रॉफी उचलू शकेल. हा अंतिम सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल, जेथे अंतिम सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया, जर पावसामुळे अंतिम सामना सुरु होऊ शकला नाही तर चॅम्पियन कोण होणार?
हवामान कसे असेल?
वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार हा अंतिम सामना सकाळी साडेदहा वाजता तर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होईल. सकाळी 6 ते 8 या वेळेत बार्बाडोसच्या काही भागात जोरदार वारे आणि गडगडाटी वादळे वाहण्याची शक्यता आहे. तसेच 51 टक्के पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सामना उशिरा सुरू होऊ शकतो, परंतु दुपारी पुन्हा जोरदार पाऊस आणि वादळ अपेक्षित आहे, त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
अंतिम सामन्यासाठी आहे राखीव दिवस…
विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस जरी ठेवण्यात आला नसला तरी, पाऊस किंवा वादळामुळे 29 जूनला अंतिम सामना होऊ शकला नाही, तर सामना 30 जून रोजी सुरू ठेवला जाईल. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सामना 29 जून रोजी उशिरा सुरू झाल्यास, 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
काय आहेत नियम…?
आयसीसीच्या नियमानुसार सामना नियोजित दिवशी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पाठलाग करणारा संघ 10 षटके खेळू शकला नाही तर सामना राखीव दिवशी हलविला जाईल. तर राखीव दिवशीही खराब हवामानामुळे सामना पूर्ण झाला नाही तर अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.